Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

No title

आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या पवित्र स्मृती -
इंग्रजांचे कर्दनकाळ भारतीय संस्कृतीचा अभिमान 
सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क........
                  आज 9 जून आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची आज पुण्यतिथी.बिरसा मुंडा हे एक भारतीय आदिवासी क्रांतिकारक होते. ते आदिवासी समाजाचे वीर नायक होते. 19 व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा जमातीच्या आदिवासींकडून इंग्रज सरकारविरुद्ध जनआंदोलने केली, त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले होते.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासींच्या संग्रामास इतिहासात मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसा मुंडा यांनाच जाते. त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्ह्यातील उलीहातू या गावी सुगमा मुंडा आणि करमी हातू या दाम्‍पत्‍याच्‍या पोटी झाला. 

त्यांचे बालपण इतर मुंडा आदिवासी मुलांप्रमाणेच जंगलात व ग्रामीण भागात व्यतीत झाले. त्यांचे वडील जनावरे चरवण्याचे काम करायचे. तेही वडिलांसोबत रानात जावून धनुर्विद्या व नेमबाजीचा सराव करायचे. बालपणीच त्यांचा नेम फार चांगला होता. पुढे मुंडा प्रसिद्ध वैष्णव भक्त आनंदानंद पांडे यांच्या संपर्कात आले.

बिरसा मुंडा यांना आदिवासी जननायक हा कीताब जनतेनेच बहाल केला. त्‍यांचे वडील शेतमजूर होते. घरच्‍या गरीबीमुळे त्‍यांना इंग्रजी माध्‍यमाच्‍या चाईबासा इंग्लिश मिशनरी स्‍कूलमध्‍ये शिक्षणाची संधी मिळाली. इंग्रजी शिक्षणामुळे त्‍यांच्‍यावर आधुनिक विचारांचा प्रभाव पडला. परंतु त्‍यांना भारतीय संस्‍कृतीचा मनस्‍वी अभिमान होता व तो त्‍यांनी निरंतर जपला. 

नैतिक आचरणाची शुद्धता व एकेश्‍वरवादाचा त्‍यांनी पुरस्‍कार केला. ब्रिटिशांनी 1878-79 मध्ये प्रथमच वनाबद्दलचा कायदा केला व जंगल सरकारच्या मालकीचे झाले. ब्रिटिशांच्‍या राजवटीमध्‍ये आदिवासींच्‍या वनसंपत्तीवर असलेल्‍या अधिकारावर बाधा येण्‍यास सुरुवात झाली. आदिवासींना यामुळे बेघर व्हावे लागले.

 आदिवासींनी उदरनिर्वाहासाठी काही फळ, कंदमूळ, लाकुड्फाटे अथवा जनावरांसाठी चारा तोडल्यास त्यांना शिक्षा होऊ लागली आणि आदिवासीयांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. हे रोखण्‍याकरीता आदिवासींनी न्‍यायालयात याचिका दाखल केली व आदिवासींचे वनाधिकार पुनर्स्‍थापित करण्‍याची मागणी केली. परंतु सरकारने ती फेटाळल्‍यामुळे आदिवासी समाजात प्रचंड रोष निर्माण झाला.

वाचन व लेखन येत असल्याने त्यांनी महाभारत, रामायण व गीता असे अनेक हिंदू धार्मिक ग्रंथांचे वाचन केले. त्यांच्या सोबत राहून इंग्रजांच्या काळ्या धोरणाचा त्यांना फार तिरस्कार यायचा. 

बिरसा मुंडा यांनी 1900 मध्ये इंग्रजांविरूद्ध विद्रोह करण्याची घोषणा केली व म्हटले, 'आम्ही ब्रिटिश शासनाच्या तत्वांविरुद्ध विद्रोहाची घोषणा करतो. आम्ही कधीच ब्रिटिशांच्या कायद्यांना मानणार नाही. आम्ही इंग्रजांचे अधिपत्य स्वीकारत नाही.

जो इंग्रज आमच्याविरुद्ध उभा राहील त्यास आम्ही यमसदनी पाठवू. यामुळे संतप्त ब्रिटिश सरकारने आपली सेना बिरसा मुंडा यास पकडण्यासाठी पाठविली, बिरसा मुंडास पकडून देणार्‍यास त्या काळी 500 रुपये बक्षीस जाहीर केले. 

बिरसा मुंडा यांनी विविध जमातीच्या गटांना एकत्र आणले. त्यांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास प्रेरित केले. इंग्रज सरकारने बिरसा मुंडा यास अटक केली. त्यांच्यासोबत 460 आदिवासी युवकांनाही अटक करण्यात आली. अशा या महान क्रांतिकारकाचे 9 जून 1900 रोजी निधन झाले.