अक्कलकुवा प्रतिनिधी -योगेश्वर बुवा.
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील भांग्रापाणी येथे कोटी रुपये खर्चाच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट होत असून जिल्हा परिषद सदस्य बाजूबाई वसावे यांनी चौकशी ची मागणी केली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीतील अतिदुर्गम भागातील भांग्रापाणी येथील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेतंर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून ते तात्काळ थांबवून बांधकाम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबतची मागणी भांग्रापाणी गटाचे जिल्हा परिषद सदस्य बाजूबाई किरेसिंग वसावे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील भांग्रापाणी येथे प्र मार्ग क्रमांक एकला लागूनच जल जीवन मिशन योजनेअंतर्गत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे .सदर काम अत्यंत बोगस व निकृष्टरित्या केले जात असून बांधकामात कुठली ही गुणवत्ता अथवा दर्जा दिसून येत नाही .सदर पाणीपुरवठा योजनेचे काम हे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत असल्याचे व कामाचे अंदाजपत्रकीय रक्कम एक कोटी 53 लाख 16 हजार 372 असल्याचे समजते. तरीही ठेकेदाराने टाकीचे बांधकाम थातूरमातूर करून पुढे रेटले आहे. सदर कामावर देखरेख करणारे टेक्निकल माणसे देखील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिले होते किंवा कसे? हा प्रश्न सर्वसामान्य जनता करीत आहे . ठेकेदाराने केलेल्या बोगस बांधकामात केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून भांगरापाणी येथील पाणीपुरवठा योजनेच्या टाकीच्या बांधकामाची संपूर्ण चौकशी करावी व ठेकेदाराने केलेले काम पाडून टाकीचे चांगले बांधकाम करीत नाही तो पर्यत बिलाची रक्कम अदा करू नये आणि बोगस कामात संगनमत करणाऱ्या व ठेकेदाराची पाठ राखण करणाऱ्या अधिकाऱ्यावरही कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा बोगस काम करणाऱ्या यंत्रणेविरुद्ध कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यात येईल. असे भांग्रापाणी गटाचे जिल्हा परिषद सदस्य बाजूबाई किरेसिंग वसावे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे..