सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क दि ८
नागपूर:- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीतील उमेदवारी अर्जात दोन गुन्हे दडवल्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल दोन गुन्ह्यांची माहिती दडवल्याप्रकरणी याचिका ॲड. सतीश उके यांनी दाखल केली होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक शपथपत्रामध्ये दोन गुन्ह्यांची माहिती दडवल्याचा दावा या याचिकेमध्ये केला होता. याप्रकरणी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी संग्राम जाधव यांनी सर्व पक्षांची बाजू ऐकूण घेत देवेंद्र फडणवीस यांना क्लिनचिट दिली.
या निकालाची सुनावणी करताना न्यायालयाने 'फडणवीस यांनी जाणीवपूर्वक हे दोन गुन्हे लपविले असे दिसून येत नाही, त्यामुळं त्यांना दोषमुक्त करत असल्याचा निकाल दिला. तसेच फडणवीस यांच्याविरोधातील दोन गुन्हे हे खाजगी स्वरुपाच्या होते. जे गुन्हे लपवले त्याचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे मत न्यायालयाने मांडले.