Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोराई ग्रामपंचायत सरपंचांविरोधात बेकायदेशीर मुदतपूर्व अविश्वास प्रस्ताव? अन्यायाविरोधात लढा सुरू- सरपंच राजू तडवी


अक्कलकुवा दि ५ (प्रतिनिधी) –कोराई ग्रामपंचायतीचे सरपंच राजू वालजी तडवी यांनी तहसीलदार विनायक घुमरे यांनी घेतलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या निर्णयाविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी हा निर्णय बेकायदेशीर असून, राजकीय दबावाखाली घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. विशेष म्हणजे, अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नसतानाही अविश्वास प्रस्ताव आणल्याने हा निर्णय नियमबाह्य असल्याचे तडवी यांचे म्हणणे आहे.

सरपंच राजू तडवी यांचे मत:

"माझ्या कार्यकाळात अनेक विकासकामे सुरू होती. काही राजकीय हितसंबंध असलेल्या लोकांनी माझ्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. मात्र, नियमांचे उल्लंघन करून तो मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायत अधिनियमानुसार, अडीच वर्ष पूर्ण झाल्याशिवाय सरपंचाविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडता येत नाही. तरीही, नियम धाब्यावर बसवत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला, जो अन्यायकारक आहे. मी या अन्यायाविरुद्ध न्यायालयीन लढा देणार असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी माझी मागणी आहे."

वकिलांचे मत:

या संदर्भात सरपंच राजू तडवी यांचे वकील अ‍ॅड. रुपसिंग वसावे म्हणाले, "महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत (अविश्वास प्रस्ताव) नियम, 1964 नुसार, सरपंचाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात अविश्वास प्रस्ताव मांडता येत नाही. या नियमाचे स्पष्ट उल्लंघन झाले आहे. अविश्वास प्रस्तावाची नोटीस अपूर्ण किंवा नियमबाह्य असेल, तर तो कायद्याच्या चौकटीत टिकू शकत नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय न्यायालयात आव्हान देणार आहोत."

चौकशीची मागणी

या निर्णयामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. अनेकांनी तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे.

सरपंच तडवी यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, महसूल विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कसा होतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.