Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अनाथांचा नाथ,मायेचा पाझर,दयेचा सागर अनोपचंदजी जैन, तळोदेकरांचा कायम स्मरणात राहतील

सातपुडा मिरर न्युज नेटवर्क 
तळोदा दि १९ भारत ऑईल मिलचे मालक अनोपचंदजी जैन हे शहरातील मनुष्य ते प्राणीही यांच्यासाठी दातृत्ववान व्यक्ती" म्हणजे दान करण्याची वृत्ती असलेली, उदार आणि दयाळू व्यक्ती होय. म्हणूनच स्व. अनोपचंदजी गोदुलाल सेठीया (जैन) हे व्यक्तीमत्व उपाशी व्यक्ती, भिकारी, रस्त्यावर फिरणारे कुत्रे,गाय यांना दररोज नित्य नियमाने खाद्य पदार्थ वाटप करताना आढळून येत होते.ते आता अनंतात विलीन झाले असुन,गोर गरीब,प्राणी दररोज मिळणाऱ्या अन्नापासून वंचित राहतील.
       बाहेरगावाहून शहरात मुक्कामी असलेले साधुसंत, पदयात्रा करणारे नर्मदा परिक्रमार्थी यांना, खाद्य पदार्थांची मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असत आणि समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची त्यांची इच्छा त्यांना सकाळ पासून रात्री पर्यंत शहरात फिरून उपाशी व्यक्तींना हुडकून खायला द्यायचे व आत्मा तृप्त करायचा एवढे काम नित्य नियमाने सुरु असायचे.
            एकदा स्मारक चौका एका भिका-याने "शेठजी भुक लगी है,दस रुपये दो," शेठजी ने सांगितले दस रुपये मे कहा पेट भरेगा! चल क्या खाना है,समोरच वडापाव ची हातगाडी होती,तेथे नेले आणि सांगितले अब खा!भिका-याने पाच वडापाव खाल्ले,शेठजीने पन्नास रुपये बील दिले,भुक लागली आहे, पोटभरून खा, पैसे कितीही लागो शेठजी देत होते.मात्र पैसे भिका-याचा हातात देत नसत,कारण त्या पैशाचा दुरुपयोग होऊ नये.
             दररोज सकाळी घरुन निघतांना हातात एक पिशवी असायची त्यात गरमागरम गव्हाच्या पोळ्या असत, पायरीतच गाय वाट बघत उभी असायची दररोज गायीला पोळी, पाठोपाठ कुत्रे गोळा व्हायचे त्यांना पोळी खाऊ घातले की,शेठजी घरापासून जैन मंदिर पर्यंत रस्त्यावर उभे असलेले गाय कुत्रा यांना पोळी तर भिका-याला बिस्किट पुडा,फुटाणे, शेंगदाणे,खायच्या वस्तू वाटत निघायचे,हे सर्व नित्यनेमाने करायचे, ज्या दिवशी त्यांचे निधन झाले दि ७ जुन २०२५ रोजी ज्या गायीला रोज पोळी देत ती अंगणात उभी राहुन रडत असल्याचे कुटुंबियांनी सांगितले,तीन दिवस ती रोज यायची तिला पोळी देत पण खात नव्हती,त्या मुक्या जनावराला ही कळत होते की,ही आपली दररोजची व्यक्ती नाही.दारात दररोज येणाऱ्या कुत्र्यांनी ही पोळी खाल्ली नाही, मुक्या प्राण्यांनीही शेठजींबद्दल शोक व्यक्त केला.
              रात्री फेरफटका मारत शहरातील साधू संत, पदयात्रेकरु, यांच्या थांबायची जागा म्हणजे बालाजीवाडा, हनुमान मंदिर,या ठिकाणी रात्री कोणी मुक्कामी आहे का? ते शोधायचे त्यांना काही अडचण, कशाची गरज आहे का? चौकशी करायची आणि ते पुरवायचे असा दररोजचा दिनक्रम होता.
              दर शनिवारी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात जायचे नवजात बालकाला जन्म दिलेल्या महिलांचा शोध घ्यायचा,त्यांना नवे कपडे,बाळासाठी कापड,खायला काही वस्तू द्यायचे, पैश्यापेक्षा गरजेच्या वस्तू स्वतःचा हाताने देऊन गरजू व्यक्तीचा व प्राण्यांचा आत्मा तृप्त करायचा छंद - आवड आयुष्यभर जोपासत राहीले.
      निस्वार्थ सेवा,दयाळूपणा, सहानुभूती आणि प्रेम या भावनेतून इतरांची दु:खे व गरजा जाणून घेत आपला खारीचा वाटा उचलत मदत करण्याचा प्रयत्न करत,सामाजिक बांधिलकी जपत, दातृत्ववाने गरजू लोकांच्या मदतीसाठी नेहमी योगदान देत राहिले.कुठे ही प्रसिद्धीची किंवा कुठलेही बक्षीस मिळवण्याची इच्छा नाही.अशा आत्म्याला नक्कीच स्वर्गात जागा मिळाली असेल.!!!.
             जिल्ह्यांत भारत ऑईल मिलचे मालक म्हणून अनोपचंदजी सेठीया सुपरिचित होते.त्याची दोन मुले गौतमशेठ व राजूशेठ आहेत,ते ही सामाजिक राजकीय कार्यात सक्रिय आहेत.गौतमशेठ म्हणाले आहेत की, आम्ही आमच्या वडीलांचा एवढी मनुष्य व पशु सेवा करु शकणार नाही, मात्र त्याचा गाय व कुत्र्यांना पोळी देण्याचा नित्यनेम होता,तो काही अंशी पाळण्याचा पुर्ण प्रयत्न करु.

शब्दांकन - दत्तात्रय सूर्यवंशी तळोदा 
                 ९४२३४९७२७५