Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्ह्याची राज्यात भरारी; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर यांना पुरस्कार


नंदुरबार दि १९ (जिमाका) राज्य शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा सन २०२५-२६ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी तसेच तळोदा येथील आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर यांची राज्यस्तरावर पारितोषिकासाठी निवड करण्यात आली असून, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.
     महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत राबविण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रशासनातील गतीमानता, सेवा वितरणाची कार्यक्षमता, पारदर्शकता, नवोपक्रमांचा वापर आणि नागरिकाभिमुख दृष्टिकोन या निकषांच्या आधारे राज्यभरातील जिल्हे व अधिकारी यांचे मूल्यमापन करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्याने दुर्गम व आदिवासी भागात सेवा पोहोचविणे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासनातील समन्वय यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तळोदा तालुक्यातही स्थानिक पातळीवरील उपक्रमांमुळे प्रशासन अधिक सक्षम व परिणामकारक ठरले आहे.
    मंगळवार, 21 एप्रिल रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित समारंभात या पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. या समारंभास राज्यातील विविध विभागांतील विजेते अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
    या यशामुळे नंदुरबार जिल्हा व तळोदा तालुक्यातील प्रशासनिक यंत्रणेला नवे बळ मिळाले असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यातही अधिक गतिमान, पारदर्शक व जनहितकारी प्रशासन देण्यासाठी या गौरवातून प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.