सातपुडा मिरर...,
ने मजसी ने मातृभूमीला आणि जयोस्तुते जयोस्तुते या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जगप्रसिद्ध कविता अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्या पाहिजेत, असं विधान महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते रविवारी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ पुरस्काराचे वितरण पार पडले. या वर्षीचा शौर्य पुरस्कार मेजर कौस्तुभ राणे, विज्ञान पुरस्कार अभय करंदीकर, समाजसेवा पुरस्कार मैत्री परिवार व स्मृतिचिन्ह पुरस्कार अभिवक्ता प्रदीप परुळेकर यांना देण्यात आला. त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
हा कार्यक्रम दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे पार पडला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. राज्यपाल म्हणाले की, सावरकर स्मारकात विद्यार्थी आले पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हे स्मारक देशासाठी प्रेरणास्थान बनायला हवं. नाशिकच्या भगूर येथे सावरकरांचं भव्य स्मारक बनवण्याची गरज आहे. येत्या २८ मे रोजी सावकरांची १४० वी जयंती आहे. हा दिवस ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवदिन’ साजरा करण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. त्याच दिवशी देशाच्या नव्या संसदेचं लोकार्पण होणार आहे, अशी माहितीही राज्यपाल बैस यांनी दिली.
राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, वीर सावरकर हे स्वातंत्र्य चळवळीचे महानायक होते. ते एक विद्वान आणि तत्त्वज्ञ होते. दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव स्वातंत्र्यसैनिक होते. त्याचे विचार कालातीत आहेत. सावरकर म्हणजे प्रतिभा, सावरकर म्हणजे त्याग. सामाजिक कुप्रथांविरुद्ध लढणारा तो योद्धा होता. ते एक महान समाजसुधारक होते.