Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोलवीमाळ नियमित वीज खंडित, महावितरणचे दुर्लक्ष – मीटर अनेक वर्षांपासून बंद असतानाही येणाऱ्या बिलांमुळे येथील नागरिक संतप्त


अक्कलकुवा दि ८(प्रतिनिधी)  कोलवीमाळ ता अक्कलकुवा येथे गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी वाढल्या असून, महावितरणच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः काही घरांचे वीजमीटर अनेक वर्षांपासून बंद असतानाही त्यांना मोठ्या प्रमाणावर वीजबिल आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

वीजबिलांचा वाढता गोंधळ-
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वीजेचा वापर कमी असतानाही बिल जास्त येत आहे. काही ठिकाणी वीजमीटर अनेक वर्षांपासून बंद असूनही नियमितपणे बिल येत असल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. "आमचे मीटर गेल्या काही वर्षांपासून बंद आहे, तरीही बिल का आकारले जात आहे?" असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

महावितरणकडून दुर्लक्ष-
कोलवीमाळ ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात तक्रार केली असता, कर्मचाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप केला आहे. "वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. महावितरणकडून केवळ आश्वासने दिली जातात," अशी भावना नागरिकांमध्ये आहे.

वारंवार वीज खंडित, ग्रामस्थ हैराण-
गावात वारंवार वीज खंडित होत असल्याने विद्यार्थी, व्यापारी आणि लहान उद्योगधंदे करणाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी नागरिकांनी अनेक वेळा महावितरणकडे मागणी केली, मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.

गावातील प्रतिष्ठित व्यक्ती अ‍ॅड. रुपसिंग वसावे यांची प्रतिक्रिया-
गावात वारंवार वीज खंडित होण्याच्या आणि चुकीच्या वीजबिलांबाबत प्रतिनिधी अ‍ॅड. रुपसिंग वसावे यांनी महावितरणच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
"महावितरणकडून ग्राहकांची सर्रास पिळवणूक केली जात आहे. वीजमीटर अनेक वर्षांपासून बंद असूनही बिल आकारले जाणे हा गंभीर विषय आहे. यामुळे नागरिक अडचणीत येत आहेत. महावितरणने तातडीने सुधारणा करावी, अन्यथा कायदेशीर मार्गाने लढा दिला जाईल," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
तसेच, ग्रामस्थांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहावे आणि अन्याय सहन करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

नागरिकांचा आंदोलनाचा इशारा-
महावितरणने लवकरात लवकर सुधारणा न केल्यास, नागरिकांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. "जर समस्येवर त्वरित तोडगा निघाला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू," असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.