Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गोवा येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या वंदनीय उपस्थितीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव संपन्न २३ देशांतील १९ हजार भाविकांची उपस्थिती !

सच्चिदानंद  परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या वंदनीय उपस्थितीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला प्रारंभ : २३ देशांतील १९ हजार भाविकांची उपस्थिती !

गोव्याचा समुद्र पहाण्यासाठी येणारे लोक आता सनातनच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती पहाण्यासाठी येतात ! - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा  
गोवा सरकारच्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा विशेष सन्मान
       फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) - पूर्वी गोव्यात लोक समुद्र, तसेच अन्य गोष्टी पहाण्यासाठी येत होते; याउलट गोव्यात सनातन संस्थेचे कार्य चालू झाल्यावर नागरिक भारतीय संस्कृती आणि मंदिरे पहाण्यासाठी गोव्यात येतात. गोवा भोगभूमी नसून ही देवभूमी आहे. सनातन संस्कृती आणि शंखनाद महोत्सव यांमुळे येथील अर्थकारण आणि सांस्कृतिक पर्यटन वाढेल. गेल्या २५ वर्षांपासून सनातन संस्था हिंदु धर्माचा प्रसार करण्याचे मोठे कार्य करत असून सनातनने केलेली आध्यात्मिक ग्रंथनिर्मिती युवक यांना प्रेरणा देणारी आणि पुढील १०० वर्षांपर्यंत दिशादर्शक आहे. सनातन संस्थेचे कार्य समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे, असे गौरवोद्गार गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. 
       सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गोव्यात १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा शासनाच्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना शाल-श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन विशेष सन्मान केला, तर देशाच्या संरक्षण कार्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या हस्ते मुख्ममंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे साहाय्यता निधी सुपूर्द करण्यात आला.
       या महोत्सवासाठी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सौ. कुंदा जयंत आठवले यांच्या वंदनीय उपस्थितीसह २३ देशांतील १९ हजारांहून अधिक भाविक उपस्थित आहेत. प्रकृतीस्वाथ्य ठिक नसतांनाही साधक आणि भक्तांच्या प्रेमासाठी महोत्सवासाठी उपस्थित असणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या दर्शनाने उपस्थित साधक, हिंदुत्वनिष्ठ भावविभोर झाले. महोत्सवाच्या प्रारंभी शंखनाद, गणेशवंदना आणि वेदमंत्रपठाण झाल्यावर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
        या प्रसंगी गोवा येथील कुंडई येथील दत्त पद्मनाभ पीठाचे पद्मश्री सद्गुरु बह्मेशानंद स्वामीजी, ‘सनातन बोर्ड’चे प्रणेते पू. देवकीनंदन ठाकूर, केंद्रीय उर्जा राज्यमंत्री  श्रीपाद नाईक, गोव्याचे वीजमंत्री सुदीन ढवळीकर, गोवा राज्याचे समाजकल्याणमंत्री  सुभाष फळदेसाई, भाजपचे गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, कर्नाटक येथील म्हैसूर राजघराण्याचे युवराज तसेच म्हैसूरचे खासदार यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार, ‘सुदर्शन न्यूज’चे प्रधान संपादक सुरेश चव्हाणके, सनातन संस्थेचे प्रवक्ते  चेतन राजहंस आणि  अभय वर्तक उपस्थित होते.

सनातन राष्ट्राची मुहूर्तमेढ गोवा येथून होत आहे, हा ऐतिहासिक क्षण ! - श्रीपाद नाईक, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री 
         याप्रसंगी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, ‘‘सनातन राष्ट्राची मुहूर्तमेढ गोवा येथून होत आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने गोवा भूमी पावन झाली आहे. गोव्यात आक्रमकांनी लाखो हिंदूंच्या हत्या केल्या; मात्र तरीही येथील हिंदूंनी सनातन हिंदु संस्कृती अखंड ठेवण्याचे कार्य केले आहे. अशा पावन भूमीत सनातन राष्ट्रासाठी शंखनाद होणे, हा शुभसंकेत आहे. सनातन राष्ट्र निर्मितीच्या कार्यात गोव्यातील धर्मप्रेमी सनातन संस्थेसोबत आहेत.’’ 

गोवा ही ‘बीच’वर बसण्याची नव्हे, तर परशुरामाची उपासना करण्याची भूमी ! - पू. देवकीनंदन ठाकूर
       गोवा ही ‘बीच’वर (समुद्रकिनारी) बसण्याची नाही, तर परशुरामाची उपासना करण्याची भूमी आहे. पाकिस्तानचे सरकार जे स्वत: भीक मागणारे आहे, ते आतंकवादी प्रशिक्षित करून इतरांची हानी करतात, तर दुसरीकडे भारतात मंदिरे, गोशाळा आणि वेदविद्यालय यांचे निर्मिती होत आहे. त्यानंतर आमचे राष्ट्र हिंदु राष्ट्र होते आणि पुढेही रहाणार आहे. 

हिंदूंनो, राम-कृष्ण यांचा आदर्श ठेवून शक्तीची उपासना करा ! - पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी, गोवा
          आज गोव्याची समाजात जी मलिन प्रतिमा होती, ती दूर होऊन एक सात्त्विक परशुराम भूमी म्हणून गोव्याची ओळख सनातन संस्थेच्या कार्यामुळे निर्माण झाली आहे. श्री हनुमान, श्री राम, श्री कृष्ण यांच्या हातात आयुधे आहेत. ही आयुधे धर्माच्या रक्षणासाठी आहेत. आम्हाला शांती हवी आहे. सनातन धर्म टिकल्यानंतरच जगात विश्वास अन् शांती निर्माण होईल. आज हिंदू जागा न झाल्यास, तर उद्याचा दिवस आपला रहाणार नाही. सर्व समाजाने सनातनच्या राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याची आवश्यकता आहे. आम्हीही या कार्यात सहभागी आहोत. या कार्याला आमचेही आशीर्वाद आहेत.

राष्ट्राचे सनातनत्व टिकवून ठेवण्यासाठी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’! - चेतन राजहंस
      ‌ पहलगाममध्ये आतंकवाद्यांनी पर्यटनासाठी आलेल्या हिंदूंची त्यांचा धर्म विचारून हत्या केली. त्यामुळे भारतासमोर उभी असलेली आव्हाने पाहिली, तर ‘सनातन धर्मियांचे अस्तित्व आणि सनातन धर्माचे संरक्षण’ अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सनातन धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव धर्मभक्तांना आध्यात्मिक बळ देईल, एक नवचैतन्य आणि ऊर्जा प्रदान करेल.

     कर्नाटक येथील म्हैसूर राजघराण्याचे युवराज तसेच म्हैसूरचे खासदार  यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार म्हणाले, ‘‘अध्यात्म हाच आपला सर्वांचा मूळ गाभा आहे आणि तीच आपल्या सनातन राष्ट्राची मूळ संकल्पना आहे. सनातन राष्ट्र ही राजकीय सत्ताव्यवस्था नसून आध्यात्मिक सेवाभावाने केलेली व्यवस्था आहे.’’ या प्रसंगी गोव्याचे वीजमंत्री श्री. सुदीन ढवळीकर, भाजपचे गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री. दामोदर नाईक यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. महोत्सवाच्या प्रारंभी धर्मसंस्थापनेसाठी १ कोटी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या नामजपास प्रारंभ करण्यात आला. 

क्षणचित्रे :-

१. या वेळी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवलेजी का संक्षिप्त चरित्र’ या हिंदी भाषेतील ग्रंथाचे, तसेच ‘ई-बुक’चे मान्यवरांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले. 

२. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नगरी’च्या मुख्य प्रवेशद्वाराचे नामकरण ‘भगवान परशुराम सुवर्णद्वार’, नगरीतील सात मार्गांना ‘सप्तर्षीं’ची, तर तीन मुख्य मोठ्या सभामंडपांना ‘श्रीनिवास मंडपम’, ‘श्रीदेवी मंडपम’ आणि ‘भूदेवी मंडपम’ अशी नावे देण्यात आली आहेत. महोत्सवस्थळी भोजनासाठी एकूण १५ मंडप उभारण्यात आले असून त्यांची नावेही देवतांच्या नावाने देण्यात आली आहेत. भगवान श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह गोवर्धन पर्वत उचलतांनाचे श्रीकृष्णाचे, तसेच अफजलखान वधाचे कटआऊट उभारण्यात आले आहेत.
३. या वेळी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेच्या वतीने १ हजार वर्षांपूर्वीच्या सोरटी सोमनाथ जोतिर्लिंगाचे दर्शन सर्वांना करण्यात आले.