Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायत वेली येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर उत्साहात पारकायद्याविषयी जागरुकता ही ग्रामीण विकासाची गरज – न्यायाधीश व्ही. बी. शितोडे यांचे प्रतिपादन.

कोलवीमाळ दि १५ (प्रतिनिधी)  उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती, औरंगाबाद व नंदुरबार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार दिनांक 10 जून ते 22 जून 2025 या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी मोबाईल लोक अदालत व कायदेविषयक जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दिनांक 15 जून 2025 रोजी ग्रामपंचायत वेली, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार येथे एकदिवसीय कायदेविषयक जनजागृती शिबीर उत्साहात पार पडले.
     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अक्कलकुवा न्यायालयाचे  न्यायाधीश व्ही. बी. शितोळे हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ग्रामीण भागातील जनतेसाठी कायदेविषयक जागरूकता का आवश्यक आहे, याचे अत्यंत मार्मिक व विचारप्रवर्तक विवेचन केले.देशाचे संविधान प्रत्येक नागरिकाला समानता, वैयक्तिक स्वातंत्र्य, शिक्षण, आरोग्य, रोजगार व माहितीचा अधिकार यांसारखे मूलभूत हक्क बहाल करते. मात्र, आजही ग्रामीण भागातील अनेक नागरिक हे हक्क काय आहेत, याबाबत अज्ञानात आहेत. परिणामी, त्यांना शोषण, अन्याय व अपमानास तोंड द्यावे लागते. कायद्याची माहिती नसल्यामुळे न्याय मिळवण्याच्या दारातसुद्धा ते पोहोचत नाहीत,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
          पुढे बोलतांना सांगितले की,विधी सेवा प्राधिकरणामार्फत घेतले जाणारे शिबिरे, लोकअदालती व मोफत कायदेविषयक सेवा यामागील उद्देश हाच आहे कोणताही गरीब, आदिवासी, महिला किंवा दुर्बल घटकाचा नागरिक केवळ अज्ञानामुळे न्यायापासून वंचित राहू नये, असे सांगून त्यांनी न्यायाचा हक्क हा गावातल्या सामान्य नागरिकाचाही आहे, असेही त्यांनी सांगितले तसेच जमिनीचे वाद, अपघात, कर्जबाजारीपणा, कौटुंबिक तंटे किंवा शासकीय योजनांमधील अडथळे या प्रत्येक समस्येवर कायद्याने मार्ग उपलब्ध आहेत. त्या मार्गांची माहिती घ्या, वकीलांचा सल्ला घ्या, न्यायालय व विधी सेवा प्राधिकरणाचा उपयोग करा असे आवाहन त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना केले.या शिबिराचे प्रास्ताविक अ‍ॅड. रुपसिंग वसावे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड.आर. आर. मराठे,अ‍ॅड. एच. एन. पाडवी,अ‍ॅड. एम.डी.वसावे, अ‍ॅड. विलास तडवी,अ‍ॅड. आर.पी.तडवी तसेच ग्रामपंचायत वेलीच्या सरपंच सौ. रमकाबाई वळवी या उपस्थित होत्या.अक्कलकुवा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. संग्राम पाडवी यांनी ग्राहक संरक्षण कायदा, अ‍ॅड. एस. आर. राणे यांनी जमिनीशी संबंधित तंटे, तर अ‍ॅड. जितेंद्र वसावे व अ‍ॅड. फुलसिंग वळवी यांनी नागरी व कौटुंबिक कायदे या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.मोलगी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक विश्वास पावरा यांनी मोटर वाहन कायदा व सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण यावरील सादरीकरणाने उपस्थितांमध्ये कायदेशीर सजगतेचा संदेश दिला.
          या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात सहाय्यक अधीक्षक गोविंद वळवी व लिपिक हिवरे यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी पोहला वसावे, मुकेश वसवे, विरसिंग वळवी, अनिल वसावे, खुमानसिंग वळवी, अशोक वसावे, वसंत पाडवी, नारसिंग वळवी, मानसिंग वसवे, फत्तेसिंग तडवी, भिमसिंग तडवी, जलसिंग वळवी, धिरसिंग वळवी, विनेश पाडवी यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी सामाजिक कार्यकर्ते नितेश वळवी यांनी सर्व मान्यवरांचे व ग्रामस्थांचे आभार मानुन शिबिराची सांगता केली.